Monday, July 14, 2008

पांडुरंग वरदा...

आज आषाढी एकादशी. महाराष्ट्राच्या कानाकोपयातून हजारो भाविक शेकडो मैलांचे अंतर पायी तुडवून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. देहू-आळंदीहून तुकाराम - ज्ञानेश्वर यांच्या पालख्या त्यांच्या लाडक्या विठूरायाला ऊराऊरी भेटतात.


लहानपणी मी बाबांना विचारले होते, " ही एवढी लोकं चालत-चालत का जातात? बस किंवा रेल्वेनं का नाही जात?" बाबांकडे या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर नव्हतं. आज जर मला हाच प्रश्न कोणी विचारला तर माझ्याकडेही नाही. पण एवढं मात्र खरं की सिंहगड चढून जाऊन घामाघूम होऊन हिरवळीवर बसण्यात जी मजा आहे ती बाईकनं १५ मिनीटांत पोचण्यात नाही!

कोल्हापूरची महालक्ष्मी, प्रभादेवीचा सिध्दिविनायक व पंढरपूरचा विठोबा, ही महाराष्ट्राची प्रमुख आराध्य दैवतं... मी कोल्हापूरला तीन-चारदा जाऊन आलोय, मागील वर्षी सिध्दिविनायकाच्या दर्शनाचा योग आला; पण पंढरपूरला जाण्याचा योग काही जुळून येत नाही (तसेच शिर्डीला जाण्याचा). बहुदा गाठीशी आवश्यक तेवढे पुण्य नसेल तर देवही जवळ करीत नसावा!


आज दिवसभराच्या ऊपवासाने प्राण कंठाशी आले असताना "महाराष्ट्र टाईम्स" मध्ये ही बातमी वाचली, आणि वाटले, वा! "पांडुरंग दाता, पांडुरंग त्राता, अंतीचा नियंता, पांडुरंग..."

*******

म.टा. : केरसूणी विकून उदरनिर्वाह करणाया ७६ वर्षे वयाच्या सोनाबाई फाळके यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी १ लाख रूपये जमवले होते, परंतु दुर्दैवानं त्यांच्या मुलीचे अपघाती निधन झाले. विठ्ठलालाच आपलं लेकरू मानून या माऊलीनं हे सारे पैसे दान केले आणि आपले घर गाठले.

2 comments:

Dr.Anil Joshi said...

Dear Gautam,
I belong to Pandharpur & hence appreciate your comments very much.If you happen to read a marathi magazine called"Antarnaad" published from Pune atleast a few of your questions on the phenomenon called Wari would be answered.

अनिकेत भानु said...

शेवटची बातमी...काय बोलावे?