Monday, July 14, 2008

पांडुरंग वरदा...

आज आषाढी एकादशी. महाराष्ट्राच्या कानाकोपयातून हजारो भाविक शेकडो मैलांचे अंतर पायी तुडवून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. देहू-आळंदीहून तुकाराम - ज्ञानेश्वर यांच्या पालख्या त्यांच्या लाडक्या विठूरायाला ऊराऊरी भेटतात.


लहानपणी मी बाबांना विचारले होते, " ही एवढी लोकं चालत-चालत का जातात? बस किंवा रेल्वेनं का नाही जात?" बाबांकडे या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर नव्हतं. आज जर मला हाच प्रश्न कोणी विचारला तर माझ्याकडेही नाही. पण एवढं मात्र खरं की सिंहगड चढून जाऊन घामाघूम होऊन हिरवळीवर बसण्यात जी मजा आहे ती बाईकनं १५ मिनीटांत पोचण्यात नाही!

कोल्हापूरची महालक्ष्मी, प्रभादेवीचा सिध्दिविनायक व पंढरपूरचा विठोबा, ही महाराष्ट्राची प्रमुख आराध्य दैवतं... मी कोल्हापूरला तीन-चारदा जाऊन आलोय, मागील वर्षी सिध्दिविनायकाच्या दर्शनाचा योग आला; पण पंढरपूरला जाण्याचा योग काही जुळून येत नाही (तसेच शिर्डीला जाण्याचा). बहुदा गाठीशी आवश्यक तेवढे पुण्य नसेल तर देवही जवळ करीत नसावा!


आज दिवसभराच्या ऊपवासाने प्राण कंठाशी आले असताना "महाराष्ट्र टाईम्स" मध्ये ही बातमी वाचली, आणि वाटले, वा! "पांडुरंग दाता, पांडुरंग त्राता, अंतीचा नियंता, पांडुरंग..."

*******

म.टा. : केरसूणी विकून उदरनिर्वाह करणाया ७६ वर्षे वयाच्या सोनाबाई फाळके यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी १ लाख रूपये जमवले होते, परंतु दुर्दैवानं त्यांच्या मुलीचे अपघाती निधन झाले. विठ्ठलालाच आपलं लेकरू मानून या माऊलीनं हे सारे पैसे दान केले आणि आपले घर गाठले.

Wednesday, May 7, 2008

स्वामी



"स्वामी" ही थोरल्या माधवराव पेशव्यांची जीवनगाथा. लेखक रणजित देसाई यांची पहिलीच ऐतिहासिक कादंबरी. यानंतर त्यांनी "राधेय" (कर्ण), "श्रीमान योगी" (शिवाजी महाराज) यांसारख्या उत्तमोत्तम कादंबया लिहिल्या, पण जनमानसात त्यांची ओळख निर्माण झाली ते "स्वामी"कार म्हणूनच!

विलक्षण घटना-प्रसंग, विपुल व ताकदवान संवाद, अचूक शब्दयोजना, हा या कादंबरीचा आत्मा आहे. या दृष्टीने "स्वामी" ने ऐतिहासिक कादंबयात नवा प्रवाह निर्माण केला असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

रमाबाई व माधवराव यांच्यामधील भावपूर्ण प्रसंगांनी तर मराठी वाचकाला अक्षरश: वेड लावलेय. शृंगार हा संयमितपणे चित्रीत करूनही तो कसा मनोवेधक ठरू शकतो हे देसाईंनी दाखवून दिले. "स्वामी" मूळे रमा-माधव ही जोडी अजरामर, आदर्श जोडप्यांच्या यादीत कायमची विराजमान झाली आहे.

माधवरावांचा करारीपणा, त्यांची कर्तव्यनिष्ठा, दूरदृष्टी, गणेशभक्ती; रमाबाईंचा भावूक स्वभाव व पतिवरील निर्लेप प्रेम; राघोबादादांचा सत्तेवरील मोह, त्यासाठी प्रसंगी स्वजनांचा घात करण्याची त्यांची वृत्ती, मराठी राजकारणातील डावपेच, उतार-चढाव यांचे एक अनोखे दर्शन या कादंबरीत आपल्याला होते. रमा-माधवरावांबरोबरच नाना फडणीस, राघोबादादा, रामशास्त्री, सखारामबापू, हैदर-अल्ली, निजाम आदी व्यक्तिविशेषांचे जीवनपट उलगडले जातात.

ऐतिहासिक कादंबयांच्या प्रत्येक संग्रहात "स्वामी"ची उपस्थिती अत्त्यावश्यक आहे!

१४ नोव्हेंबर २०००

Monday, May 5, 2008

मागं वळून पहाताना...


कालचीच गोष्ट...
पाच-सहा मित्र लायब्ररीत बसलो होतो. अभ्यासापेक्षा चेष्टा-मस्करीच जास्त चालली होती. बोलण्याच्या ओघात एकानं सहज म्हटलं, " Send-off २८ फेब्रुवारीक जातलो अशें दिसता.." क्षणार्धात सगळा मूड खराब झाला. मी काही तसा पट्कन भावनावश वगैरे होणारा प्राणी नाही, पण मलाही कुठंतरी आत खोलवर अपार खिन्नता दाटून आल्यासारखं वाटलं.

कॊलेजमध्ये एडमिशन घेतली त्याला आज ९४८ दिवस झाले (गोकाककर सरांच्या हाताखाली वर्षभर Analytical Chemistry शिकल्याने बोलण्या-लिहिण्यात एवढी अचूकता येणं स्वाभाविक आहे!) पण ती घटना अगदी काल-परवा घडल्यासारखी वाटते. खरं तर मी येणं हा एक योगायोगच होता. बारावीनंतर मी एका नामांकित कॊलेजमध्ये BCA साठी प्रवेश घेतला होता, पण जुनाट अभ्यासक्रम व शिक्षकांची बेपर्वा वृत्ती यामुळे वैतागून मी त्याला लवकरच राम-राम ठोकला.
पुढं काय करायचं या विवंचनेत असताना पी.ई.एस. मधील Industrial Chemistry या अभ्यासक्रमाबद्दल कळलं; बारावीत असताना रसायनशास्त्राची गोडी लागलीच होती. वाटलं, यात आपण काहीतरी करू शकू. अशा तर्र्हेने स्वारी पी.ई.एस.कोलेजमध्ये दाखल झाली.गेल्या दोन-अडीच वर्षांत मला एकदाही या निर्णयाचा पश्चात्ताप झाला नाही हे मला इथं आवर्जून नमूद करावंसं वाटतं.

सुरवात जरा कठीण गेली. माझा स्वभाव बराचसा एकलकोंडा, आपल्याच कोषात गुरफटून रहाण्याचा. मी कोलेजमध्ये गूपचूप यायचो, लेक्चर्सना बसायचो, आणि नंतर सरळ घरी यायचो. मैत्री तर सोडाच कुणाशी साधी तोंडओळखपण झाली नव्हती.
पण लवकरच आमचा मस्त ग्रुप जमला. प्रत्येकाचे स्वत:विषयी अनेक गैरसमज. युवराजला वाटायचं की आपला आवाज जगजितसिंग सारखा असून यच्चयावत मूली आपल्यावर फिदा आहेत. विशालला आपण सर्वशक्तीमान असल्याचा भास व्हायचा. सम्राट इंटरनेटच्या महाजालात गुरफटलेला, तर ब्रिजेश आपल्या कम्प्युटरवरील mp3 गाण्यांची संख्या वाढवायच्या मागे लागलेला. क्रिकेट series सुरू असली की उल्हासला प्रोफेसरांच्या जागी सचिन सौरव दिसायचे. एकही लेक्चर न चुकविण्याचा गंधालीचा अट्टाहास तर रश्मी एक दिवस आली की चार दिवस गायब. एक सच्चा मित्र या नात्याने मी या सर्वानां कायम जमिनीवर आणण्याच्या प्रयत्नात असे.

आम्ही सर्वजण मोकळ्या मनाचे, आणि त्याहून मोकळ्या तोंडाचे; त्यामुळे रोज विशाल x मदन, युवराज x सागर, रश्मी x गंधाली अशा चकमकी चालू असत. मला आणि सागरला तर दिवसातून एकदा तरी कडाक्याचे भांडण झाल्याशिवाय वडा-पाव घशाखाली उतरत नसे.
पुढे मागे मी एखादा शब्दकोश वगैरे लिहिलाच तर त्यात "अष्टपैलू" याला समानार्थी शब्द "आत्माराम" देईन. रिचर्ड कायम मूलींच्या मागे. कधी-कधी मात्र रिची पुढे आणि त्याला बदडायला मूली त्याच्यामागे असंही चित्र पहायला मिळायचं.

माझी मुलींशी ओळख बरीच ऊशीरा झाली आणि (सुदैवाने असो अथवा दुर्दैवाने) ती निव्वळ मैत्रीपुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळे हा भारत देश (अजून एका !) अजरामर प्रेम-कहाणीला कायमचा मुकला.

या सर्व मित्रांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. लेक्चर्स बुडवून कॆन्टीनमध्ये बसणे, लायब्ररीमध्ये शांत वातावरण चुकूनही रहाणार नाही याकडे जातीनं लक्ष देणे, यासारख्या अनेक गोष्टी मी त्यांच्याकडूनच शिकलो. खरोखर, आज मी जो काही आहे, तो माझ्या या मित्रांमुळेच; ते मला भेटले नसते तर... तर मी नक्कीच कोणीतरी चांगला आणि मोठा माणूस बनलो असतो.

आमची प्रेक्टीकल्स म्हणजे अक्षरश: समरप्रसंग असे. कुठे Sodium fusion tubes फुटताहेत, कुठे धूराचे लोट ऊठताहेत, कुणाच्या एप्रनवर concentrated acid सांडतय, तर कुणाच्या तोंडात Strong alkali जातेय अशा धुमशचक्रीत आमचा chemical analysis चालायचा. तिसया वर्षाच्या प्रकल्पासाठी तर आम्ही TNT (एक अतिस्फोटक रसायन) बनवायचा घाट घातला होता, परंतु तो हाणून पाडण्यात आला.

पी.ई. एस. कॊलेज ही जर एक कंपनी मानली तर या कंपनीचे प्रमुख assets आहे इथला उत्कृष्ट शिक्षकवर्ग आणि सेवाभावी वृत्तीनं काम करणारा कर्मचारीवर्ग. गणित शिकविणाया सामंतबाईंच्या करड्या नजरेचा सुरूवातीला प्रचंड धाक वाटायचा, पण Group Theory व Operations Research सारखे क्लिष्ट विषय त्यांनी इतक्या रंजक रितीने समजावले कि त्यांच्याबद्दल आवड कधी निर्माण झाली ते माझं मला कळलं नाही. कुलकर्णी सर आम्हाला बरोबरच्या मित्रांप्रमाणे वागवत, त्यांच्या कोल्हापूरी पायतणांचा जसा चर्र चर्र आवाज यायचा तसा मी नंतर कुठेच पुन्हा ऐकला नाही.

पी.ई. एस. कॊलेजनं मला काय दिलं याचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर मी म्हणेन - माझा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिला! प्रथम वर्षात असताना मी कॊलेजचं मासिक "आदित्य" साठी एक छोटासा लेख लिहीला होता. आमचे प्रिन्सिपल डिंगे सरांनी आपल्या केबिनमध्ये मुद्दाम बोलावून त्याबद्दल शाबासकी दिली होती. विमनस्क मनस्थितीत पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने मनाला ऊभारी आली, आपण पुन्हा झेप घेऊ शकतो ही जाणीव निर्माण झाली.
गेली तीन वर्षं आम्ही शिक्षकांच्या छत्रछायेखाली, मित्रांच्या सहवासात एक प्रकारच्या सुरक्षित वातावरणात काढली. आता यापुढची वाटचाल एकट्याने करावी लागणार या विचाराने अस्वथ व्हायला होतं. इंटरनेट, मोबाईलमुळे संपर्कव्यवस्थेत क्रांती झाली असली तरी आपली माणसं एकदा दूर गेली की पुन्हा भेटतातच असं नाही, आणि भेटली तरी पुर्वीची ती ओढ कायम रहातेच असं नाही. आज कायम contact मध्ये रहाण्याच्या शपथा घेणारे आम्ही, सहा महिन्यांतच कुठे कुठे विखुरलेले असू हे आमचं आम्हालाच माहित नाही.

असो... माझी एवढीच सदिच्छा आहे कि आमच्या batch मधला प्रत्येकजण आप-आपल्या क्षेत्रात फार पुढे जावा. मला मान वर करून सांगता आलं पाहिजे की, " तो माझा मित्र आहे, आणि पी.ई. एस. कॊलेजमध्ये आम्ही एकमेकांबरोबरच लेक्चर्स बुडवली आहेत!"

("आदित्य" - २००४)

Sunday, May 4, 2008

माझे कॊलेज-गाणे - विडंबन

चाल: "माझे जीवनगाणे"
.... पु.ल., क्षमा करा!

माझे कॊलेज-गाणे, माझे कॊलेज- गाणे
कधी ऐकतो शिव्या घरातून, टाईमपास करतो मी म्हणून
कधी बाबा तर कधी आईही, गाती हेच तराणे
माझे कॊलेज-गाणे, गाणे...

अभ्यास असो वा, प्रोजेक्ट असू दे
सेमिनार असो वा, टेस्ट असू दे
लेक्च्रर असो, वा प्रॆक्टीकल असू दे
"Bunk" मारीत रहाणे!
माझे कॊलेज-गाणे, गाणे...

गा मित्रांनो माझ्यासंगे, वड्यावरी हा जीव तरंगे
तुमचाही ठाव कॆन्टीन असू दे, हेच माझे गार्र्हाणे
माझे कॊलेज-गाणे, गाणे...

("आदित्य" - २००२)

Saturday, May 3, 2008

जिवलगा - (विडंबन)

कै. शांताबाई शेळके यांची क्षमा मागून...
-- गौतम




जिवलगा चालले रे दूर कॊलेज माझे
डोके शिणले, अभ्यासाचे जड झाले ओझे !

रोज बोलती बाबा - आई
नोट्स सभोवती दाटून येती
गत मित्रांची सुटली माया
टेन्शन बहु साचे...

क्लास मागचा मागे पडला
पायदळी ग्राऊंड तिमिरी बुडला
ही कॆन्टीनची सुटे सराई
मिटले जिमखाने...

निराधार मी, कॊलेज-वासी
डिग्रीविना मरेन ऊपाशी
कर मजला पास आता
महिमा तव गाजेल !!
("आदित्य" - २००४)

Tuesday, April 29, 2008

ययाति

ययाति- वि स खांडेकर
वि. . खांडेकरांच्या "ययाति" ने मराठीला पहिला "ज्ञानपीठ" पुरस्कार मिळवून दिला आहे, एवढे सांगितलेतरी या साहित्यकृतीचे महत्त्व ध्यानी येते.

"ययाति" महाभारतातील एका उपकथानकावर आधारीत आहे. नहुषपुत्र राजा ययाति, दैत्यगुरु शुक्राचार्यांचीकन्या देवयानी, दैत्यराज वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा देवगुरू बृहस्पतीपुत्र कच, ही या कादंबरीतीलप्रमुख पात्रें. पैकी ययाति -देवयानी - शर्मिष्ठा यांच्या आत्मनिवेदनातून कथा उलगडत जाते. मानवीजीवनाची सफलता इतिकर्तव्यता यावर या कादंबरीत सखोल चिंतन करण्यात आले आहे. मुख्य कथानकलहान असले तरी मानवे मनोविकारांचे दर्शन, भावनिक गुंतवणुक या द्वारे कथेचे रूपांतर एका नाट्यमयसंघर्षात करण्यात वि. . खांडेकर यशस्वी झाले आहेत.

वासनातिरेकाने माणूस किती रसातळाला जाऊ शकतो याचे विदारक चित्रण आपल्याला कादंबरीत दिसते - राजा ययातिच्या रूपात. या उलट, माणूस आपल्या आत्मिक सामर्थ्याच्या जोरावर किती उन्नती करू शकतो, ते कच दाखवून देतो. तो ययाति- देवयानी- शर्मिष्ठा या त्रयील जीवनाचे रहस्य वेळोवेळी विशद करून सांगतो.

"ययाति"च्या कथाभागाइतकेच तिच्या "पार्श्वभूमी" लेखकाने मांडलेले विचारही तेवढेच मनन करण्याजोगेआहेत. कथावस्तू पौराणिक असली तरी तिचा आशय कालातित कसा आहे, हे आपल्याला तिथे उमजूनयेते.अर्थगर्भ, उच्च विचारांनी परीपूर्ण असे साहित्य वाचण्याची आवड असलेया प्रत्येकाने "ययाति" वाचलीच पाहिजे!
प्रकाशक: देशमुख आणि कंपनी
पृष्ठें: ४२५

२५ नोव्हेंबर २०००

Monday, April 28, 2008

मृत्युंजय

कर्ण - महाभारतातील एक अलौकिक व्यक्तीमत्व. महाभारतातील कुठलीच व्यक्तिरेखा सामान्य नाही; परंतु त्या सर्वांतही कर्ण आपला स्वतंत्र ठसा उमटवून जातो.वस्तुत: सूर्यपूत्र असलेल्या, पण आयुष्यभर सूतपूत्र म्हणून अवहेलना सहन करीत जगलेल्या कर्णाच्या जीवनावर ही कादंबरी आहे.

कादंबरीची शैली निवेदनात्मक आहे. कर्णमाता कुंती, कर्णबंधू शोण, कर्णपत्नी वृषाली, कर्णसखा दूर्योधन, श्रीकृष्ण स्वत: कर्ण यांच्या निवेदनातून कर्णाचा जीवनपट त्या बरोबरच महाभारतकथा उलगडत जाते.प्रासादिक, अलंकारांनी परीपूर्ण अशी भाषा विलक्षण संवाद हा या कादंबरीच आत्मा आहे. लिहून ठेवावीत अशी चिंतनगर्भ वाक्ये पाना-पानावर आहेत. ती लिहून काढली तर तो एक अमूल्य असा साहित्यिक ठेवा बनेल.
कर्णाची चरीत-कहाणी सांगत असताना त्याच्या अवती-भवती असणाया व्यक्तिरेख रंगविण्यातही शिवाजीसावंत सफल झाले आहेत. त्यामुळे हा ग्रंथराज कुठेच एकसुरी झाल्यासारखे वाटत नाही. महाभारतकालीनभाषा, वेशभूषा, चालीरीती, समाजव्यवस्था, आदी गोष्टींबद्दल लेखकाने घेतलेले परीश्रम सहज कळून येतात.

आज "मृत्युंजय" हा मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानला जातो. ही कादंबरी वाचलेल्या कोणत्याही मराठी वाचकाचे वाचन हे अपूर्णच मानावे लागेल.कर्णावर "मृत्युंजय" पूर्वी नंतर बरेच लिखाण झाले आहे; पण ज्याप्रमाणे माधवराव पेशवे म्हटले की "स्वामी" आठवते, त्याचप्रमाणे कर्ण म्हटले की डोळ्यापूढे फक्त एकच नाव येते - मृत्युंजय!

१४ नोव्हेंबर २०००

Friday, April 25, 2008

मोठी आजी

मोठी आजी म्हणजे माझी सख्खी आजी. शिरोड्याला रहाणारी. आम्ही आता २५-२५ वर्षांचे घोडे झालो तरीअजूनही चतुर्थी-दिवाळीला फ़टाक्यांसाठी पैसे पाठवणारी. फ़ोनवर बोलताना रुक्ष "हॆलो" ऐवजी " ऊषा" "गौतम" अशी अकृत्रिम हाक मारणारी. तिच्या नातवांना चष्मे लागले तरी स्वत: मात्र अजूनही बिनचष्म्याने सुईत दोरा ओवणारी.माझ्या आईची आई.

मी लहानपणी जास्त वेळ आजोळी राहिल्याने असेल, अथवा आजीच्याच भाषेत सांगायचं तर हा "नक्षत्रांचागुण" असेल, पण माझं आणि आजीचं प्रथमपासूनच छान जमत गेलंय. आजही हातून काही चांगलं काम घडलंहा योग क्वचितच येतो!) तर आई-बाबांनंतर माझा फ़ोन जातो तो आजीलाच.
Graduation च्या वेळची गोष्ट... माझ्या अभ्यासाची लक्षणं ठीक दिसत नाहीसे पाहून आईनं आजीला पाचारण केलं आणि मी खरंच वर्षभरात केला नसेल एवढा अभ्यास आजी आल्यानंतरच्या महिन्याभरात केला.
पहाटे चार वाजता आजी आपल्या मऊसूत आवाजात हाका मारू लागायची. आधी मी "ऊठतोच" "फक्त पाचमिनीटं" वगैरे बडबडून पुन्हा झोपायला बघायचो; पण आजीच्या हाका काही थांबायच्या नाहीत आणिऊठल्याशिवाय गत्यंतरच नसायचं. मी अभ्यासाला बसल्यावर झोपून पडू नये म्हणून आजी १५-२०माझ्यासोबत बसायची, आणि माझी झोप आता पक्की उडालीय याची खात्री पटल्यावरच झोपायला जायची.
नंतरही दिवसभर माझ्या अभ्यासावर तिचं जातीनं लक्ष असायचं. या supervision चं मला दडपण कधीच आलं नाही. उलट फायदाच झाला. एक गंमत सांगतो. माझा एक मित्र जुन्या प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे घेऊन यायचा; तास -अर्धा तास त्यातील प्रश्नांशी झटापट - बहुदा निष्फळ !- केल्यावर आमची गाडी क्रिकेट, सिनेमा, कॊलेजमधील भानगडी यांसारख्या अतिमहत्वाच्या वळायची. आजीनं एक-दोनदा हे पाहिलं, पण काही बोलली नाही. दुसया वेळी तो येऊन टपकताच आजीनं त्याला "गौतम घरान ना" असं सांगून बाहेरच्या बाहेरंच पिटाळून लावलं. मी आत आहे हे त्याला माहीत होतं, बाहेर तो आला आहे हे मला कळलं होतं, पण आम्ही दोघं काय ते समजून चुकलो. परीक्षा होईपर्यंत पुन्हा काही तो मित्र परत आला नाही.
दिवसभराच्या कडक शिस्तीची भरपाई आजी रात्री करायची ती झोपण्यापुर्वी डोक्याला खोबरेल तेल थोपटून. काही क्षणांतच सारा शीण दूर जायचा. डोकं हलकं व्हायचं. मुलावरील आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी आईही अधून-मधून प्रयत्न करायची, पण आजीचा हात लागताच जी एक विलक्षण गुंगी यायची तो अनुभव आईच्या हातून कधी आला नाही.

आमच्या पिढीशी आजीचं अगदी उत्तम जमतं याचं प्रमुख कारण म्हणजे तिचा बहुश्रूतपणा. "जुनं ते सोनंआणि नवीन म्हणजे खोटं नाणं" असा तिचा कधी अट्टाहास नसतो. ती "रामायण" "महाभारत" पहाते, आणिदामिनी" " "अवंतिका" ही पहाते. बातम्या ऐकते. रोजचा पेपर वाचते. गावातल्या, गोव्यातल्या एवढंच कायपण देशातल्या आणि जगातल्या ठळक घडामोडींची तिला कल्पना असते. राजकारणात तर तिची स्वत:ची अशी ठाम मतं आहेत आणि ती ठासून मांडायला ती अजिबात कचरत नाही. तिचं "पक्षांतर" घडवून आणण्याच्या बाबतीत माझ्यासकट सर्वांनीच हात टेकलेत. आजचे दल-बदलू राजकारणी आजीचा हा एक जरी गुण ऊचलतील तर किती चांगले होईल!

जुनी माणसं सनातनी, कर्मठ असतात असा एक सर्वसाधारण अनुभव असतो. आमची आजी मात्रदेवाधर्माच्या बाबतीत अतिशय पुरोगमी आहे. प्रत्येकानं काही प्रमाणात तरी पूजा-अर्चा करावी, सोवळं-ओवळं पाळावं असा तिचा कटाक्ष नक्कीच असतो. पण कर्मकांडाचा अतिरेक ती स्वत:ही कधी करतनाही, आणि दुसयांवर तर सक्ती मुळीच नाही.
म्हातारी माणसं भोळी-भाबडी असतात हा आणखी एक समज. आजी मात्र चांगलीच धूर्त आणि व्यवहारचतुर आहे; दुसयाला अडचणीत आणता दुखवता आपली काम कशी करावी हे तिच्याकडूनच शिकावं.

सर्वांवर तिची माया आहे पण हे करताना तिनं वास्तवाचं भान कधी सुटू दिलेलं नाही. ज्या गोष्टी झाल्यापाहिजेत असं तिला वाटतं त्या केल्याशिवाय ती रहात नाही आणि ज्या गोष्टी पटत नाहीत त्या बोलूनदाखवायला ती डरत नाही. आजच्या "ओठात एक आणि मनात दुसरंच" अशा जमान्यात आजीच्या स्वभावातला हा पारदर्शीपणा अधिकच भावतो.

माझं शिक्षणासाठी पुण्याला जायचं ठरलं तेव्हा ही बातमी कानावर घालण्यासाठी शिरोड्याला गेलो. मामा-मामी, मावशी यांनी "सांभाळून रहा" "नीट अभ्यास कर" वगैरे सांगितलं. आजीचा ऊपदेश मात्र सर्वस्वीवेगळा आणि माझे पाय जमिनीवर आणणारा होता. ती म्हणाली, " आई-बाबांनी तुझ्या शिक्षणासाठी जो खर्च केला तो ध्यानात ठेवा. नोकरी धंदा लागल्यावर आधी तो हिशोब चुकता कर आणि नंतरच काय ती मौज-मजा."

अशी आमची आजी. तिच्यासारखी आजी आम्हाला लाभली आहे हे आम्हा भावंडांचं भाग्य यात वादच नाही. पण आमच्यासारख्या एकापेक्षा एक ऊपद्व्यापी नातवांबद्दल तिचं काय मत आहे हे मात्र आम्ही तिला अजून विचारलेलं नाही.

(२५ ऒगष्ट २००४)
( "